Translate

शनिवार, २१ मार्च, २०२०

भानामती किंवा देवी महिलांच्याच अंगात का येते?

आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणांवर प्रत्येक स्त्रीला कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागतं. त्यावेळी तिच्या मनावर होणाऱ्या परिणामांचा क्वचितच कुणी विचार करतं. 'बाईचं मन' या मालिकेतून आम्ही तिच्या मनात डोकावून पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. हा लेख याच मालिकेचा एक भाग आहे. महिला, अंधश्रद्धा आणि मानसिक आजार यांचा परस्परांशी काय संबंध आहे, हे उलगडून सांगणारा लेख.


भानामतीचा प्रकार खरंच असतो का? आणि हे फक्त महिलांच्याच अंगात का येतं?

सणा-समारंभाला, जत्रेत, पूजा-आर्चा होत असताना एखाद्या बाईच्या अंगात अचानक जोर येतो, ती घुमायला लागते. त्या महिलेच्या अंगात देवी आली असं काहीजण म्हणतात. तर आपल्या अंगात कोणी प्रसिद्ध ऐतिहासिक व्यक्ती कालांतराने येत राहते, असं एखाद्या महिलेला वाटत राहतं. तर भानामतीमुळे एखादी स्त्री पछाडली गेलीये आणि त्यात सगळं कुटुंबच भरडलं जातं अशीही उदाहरणं ऐकायला, पाहायला मिळतात. बहुतांशवेळा हे प्रकार महिलांसोबतच घडतात.

दोन महिन्यांपूर्वीची घटना. अनिताचं (बदललेलं नाव) लग्न होऊन सहा महिने उलटले असतील. घरात अकल्पित गोष्टी घडायला सुरुवात झाली. घरात कधी अचानक भांडी पडायची, वस्तू गायब व्हायच्या. कधी गरज नसताना गॅस सुरु राहिलेला असायचा. एकदा तर अंगावरच्या कपड्याने पेट घेतला. नंतर चक्क एकदा तर घरातला नऊ तोळे दागिन्यांचा डबा गायब झाला. हळूहळू घरातल्या किंमती वस्तू नाहीशा व्हायला लागल्या. तिच्या घरातलेही या घटनांनी हादरुन गेले होते. या सगळ्या घटनांमध्ये तोपर्यंत कोणाला इजा झाली नव्हती. पण तिच्या अंगावर लाल रंगात फुल्या यायला लागल्या आणि कोणीतरी करणी करतंय याची चर्चा जोरात सुरू झाली. घराबाहेरही भानामतीचे किस्से रंगू लागले. एकाचं दुसऱ्या कानाला जाताना त्यात किश्श्यांची भर पडू लागली. तिला आधी डॉक्टरकडे नेण्यात आलं. पण अंगावरच्या खुणा बंद होणं काही थांबलं नाही.

औरंगाबादच्या शहाजी भोसले यांनी आतापर्यंत देशभरात भानामतीच्या 302 केसेस हाताळल्या आहेत. अंधश्र्रद्धा निर्मूलन समितीचं ते गेली तीस वर्षं काम करतायत. भानामती म्हणजे कोणीतरी घडवून आणतं, अशी लोकांची धारणा असल्याने अनितासोबत जे घडतंय ते का आणि कसं याचा शहाजी भोसले यांना शोध घ्यावा लागणार होता. कोणीही आजूबाजूला नसताना त्यांनी फक्त अनिताशीच चर्चा केली. अंगावर लाल फुल्या कशा आल्या विचारताना त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की तिच्या लिपस्टिकचाही रंगही तोच आहे. त्यांनी अनिताला पुढे विचारलं- कोणी भानामती करत असेल तर नुसत्या फुल्या कश्या?
भानामतीसाठी काळ्या कपड्याच्या बाहुलीला टाचणी किंवा कापण्यासाठी फुल्या मारल्या तर तशाच वेदना वा जखमा त्या व्यक्तीला होतात, असा काळी जादू करणाऱ्यांचा दावा असतो. त्याविषयी शहाजी भोसलेंनी अनिताला सांगितलं. दुसऱ्या दिवशी अनिताच्या हातावर, पायावर, मांडीवर लाल-काळ्या रंगात फुल्या आणि त्यासोबत जखमाही दिसू लागल्या. अंगावर झालेल्या खुणा बिब्बाच्या आहेत हे त्यांच्या लक्षात आलं. बिब्बाचं तेल त्वचेला घातक असतं. त्याच्या फुल्या मारल्यानंतर काही मिनिटांनी व्रण दिसायला लागतात. आणि जिथे आपला हात पोहचू शकतो तिथेच हे व्रण दिसतात. शहाजींसमोर हे मान्य करायला अनिता तयार नव्हती. आणि घरातले चमत्कारिक प्रकार थांबायलाही तयार नव्हते.

अनिताच्या घरात स्वयंपाकघरातील भांडी पडण्याचे प्रकार वाढू लागले. एक दिवस सकाळी शहाजी यांनी जाणीवपूर्वक घरातल्या सर्व मंडळींना घरी थांबवून घेतलं. सर्वांना स्वयंपाकघरात यायला सांगितलं. वीस मिनिटं झाली तरी एकही भांडं पडलं नाही. शहाजींनी सगळ्यांना बाहेर जायला सांगितलं आणि मुद्दामहून तिला शेवटी ठेवून तिच्याकडे दुर्लक्ष केल्यासारखं दाखवलं. ती जशी स्वयंपाकघरातून बाहेर पडली तसा एक डबा गडगडत आली पडला. तो तसा पडावा म्हणून अनिताने त्याखाली एक पेपर ठेवला होता, हे शहाजींच्या लक्षात आलं. भानामतीचा प्रकार खरंच आहे, हे सांगण्याचा अनिताचा हा खटाटोप होता. तो या प्रकाराने अपयशी ठरला.
शहाजींनी स्वतःच भानामती करणाऱ्या अनिताला रंगेहात पकडलं. नंतर तिनेही मान्य केलं की आधीचे सारे प्रकार तिनेच घडवून आणले होते. अनिताचं पूर्वी एका तरुणावर प्रेम होतं आणि हे लग्न तिच्या मनाविरुद्ध झालं होतं. त्यानंतर ती एका मनाच्या विकाराने पीडित झाली. घरातल्याचं लक्ष, सहानुभूती मिळवण्यासाठी तिने रहस्यमय गोष्टी रचायला सुरुवात केली.
I

शहाजी भोसलेंच्या मते, "भानामतीच्या 99 टक्के घटनांमध्ये पीडित महिला स्वतःच भानामती करत असते. त्यामागचं वैज्ञानिक सत्य शोधून काढावं लागतं. या घटना रायायनिक अभिक्रिया, भौतिक अभिक्रिया आणि हातचलाखीने भरलेल्या असतात. तर एक टक्के घटनांमध्ये एखादी व्यक्ती दुसऱ्याच्या बाबतीत सगळं घडवून आणते. त्यात आकस किंवा त्रास देणं हा हेतू असतो. पीडित महिलेच्या अंगावरचे कपडे पेटतात पण तिला इजा होत नाही, घरावर दगड पडतात पण त्यात कोणी जखमी होत नाही, त्यामुळे भानामतीत कोणाचा मृत्यू झालेली उदाहरणं दिसत नाहीत. भानामती आणि मराठवाड्यातल्या बिब्बा म्हणजेच गोट्याच्या झाडाचा जवळचा संबंध आहे. भोकरदन, फुलांब्री, सिल्लोड, कन्नड या भागात बिब्बाची झाडं अधिक प्रमाणात आढळतात. त्यामुळे भानामतीमध्ये बिब्बा अनेकदा वापरला जातो."

डोळ्यातून खडे पडणारी महिला, सलग पंधरा दिवस साप चावला असं सांगणारी मुलगी, अचानक कोणीतरी केसांची वेणीच कापून टाकली अशी प्रकरणं शहाजी भोसले यांनी हाताळली आहेत. अशा महिलांच्या मनावर उपचार करण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांची मदतही घेण्यात आली. भानामतीचे प्रकार कमी होतायत का? शहाजी भोसले यांच्या मते, उलट भानामतीची प्रकरणं खूप मोठ्या प्रमाणात पुढे येताना दिसतायत. पूर्वी मांत्रिक, तांत्रिक यांच्याकडे जाणारी मंडळी आता जागरूक होऊ लागली आहेत. भानामतीच्या केसेस त्यांच्याकडे महिन्यातून एक-दोन येतातच. बुवा-बाबांच्या आर्थिक, लैंगिक शोषणाला बळी पडलेल्याची उदाहरणं ताजी आहेत.
भुंकणारी भानामती

मराठवाड्यात भानामती हा शब्द प्रचलित आहे. काही वर्षांपूर्वी भुंकणारी भानामती असा शब्दही गावागावांमध्ये प्रचलित होता. महिलेच्या अंगात कोणी दुसरी व्यक्ती आलीये आणि तोंडातून हूं हूं करतेय म्हणून तिला भुंकणारी भानामती म्हटलं जाई. हल्ली हा शब्द मागे पडलाय.

ज्याला भुंकणाऱ्या भानामती म्हटलं जातं त्या अंगात आलेल्या महिला आपल्याला आजही जत्रा, घरगुती किंवा सार्वजनिक समारंभात दिसतात. त्यांच्या कधी देवी अंगात येते तर कधी एखादी मृत पावलेली व्यक्ती. असे प्रकार सर्रास संपूर्ण भारतात पाहायला मिळतात. प्रसिद्ध देवस्थान, पीर- दर्गा असो की कुंभमेळे. त्याला धर्माचंही बंधन नाही.

अगदी ताजं उदाहरण आहे. महाशिवरात्रीला फेसबुकवर अडीच लाख मेंबर असलेल्या महिलांच्या एका ग्रुपवर अशाच एका महिलेचा व्हिडिओ पोस्ट केला गेला. मंदिरात शंकराची आरती सुरू होती, तितक्यात एक बाई हूं हूं आवाज करत वाऱ्याच्या वेगाने मुर्तीसमोर गेली. ती इतकी वेगाने घुमू लागली की सोबत असलेल्या दोघांना तिला आवरणं कठीण जात होतं. बाजूच्या भिंतीला तिने जोरजोरात धडका मारायला सुरुवात केली. हा व्हिडिओ पोस्ट झाल्यावर तासाभरात त्याला हजारो लाईक्स मिळाले आणि कमेंटही आल्या. त्यात बहुतेक कमेंट्स नमस्कार इमोजीच्या होत्या. कित्येक महिलांचा देवी अंगात येणं यावर विश्वास असल्याचं यातून स्पष्ट दिसलं.

डोंबिवलीत राहणारे सुशीला मुंडे आणि मच्छिंद्र मुंडे गेली 25 वर्ष अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करताना देवी अंगात येण्याचे प्रकार जवळून पाहिले आहेत. बहुतांश प्रकरणांमध्ये लैंगिक शोषणातून झालेली मानसिक कोंडी, महिलांची लैंगिक उपासमार हे कारण पुढे आल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

अंगात येतं म्हणजे नेमकं काय होतं?

"अंगात येणं हा प्रकार आपल्या संस्कारांशी जोडलेला असतो. काही ठराविक परिस्थितीमध्ये प्रासंगिक मनोविघटन होतं. यात आपल्या इंद्रियांकडून वर्तनाकडे सूचना पाठवली जाते. ढोल किंवा आरतीचा आवाज, धूप-अगरबत्तीचा वास यामुळे इंद्रिय उद्दिपीत होतात. त्यावेळी शरीरातील ताकदीचा रिझर्व्ह फोर्स वापरला जातो. एरव्हीपेक्षा अनेक पटीने ताकद असल्याचं आजूबाजूच्या लोकांना जाणवतं."

अशी प्रकरणं हाताळताना प्रसंगी काही क्लृप्त्याही कराव्या लागतात असं मच्छिंद्र मुंडे म्हणतात. एकदा एका महिलेच्या अंगात दर पोर्णिमेला देवी यायची. हा दिवस कधीच चुकायचा नाही. अंनिस म्हणजेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना 22 जूनची पोर्णिमा चुकवायची नव्हती. त्यांनी एक प्रयोग करायचा ठरवला. जुनं कॅलेंडर शोधून तिच्या घरी लावण्यात आलं. त्यात 12 जूनला पोर्णिमा होती. अपेक्षेप्रमाणे त्या महिलेच्या अंगात दहा दिवस आधीच देवी आली. दुसऱ्या दिवशी तिला बदललेल्या कॅलेंडरविषयी सांगण्यात आलं. ती निरागसपणे म्हणत होती, मला खरंच कळत नाही हे कसं होतं. समुपदेशनाच्या अनेक भेटींनंतर तिची घरात झालेली मानसिक कोंडी आणि लग्नानंतरही झालेली लैंगिक उपासमार हे कारण असल्याचं उघड झालं.

तज्ज्ञांच्या मते- नेहमी त्याच त्या गोष्टींचा विचार केल्याने मेंदूतील रसायनांचा समतोल बिघडतो. अशा वेळी स्वतःच्या मनातल्या दुःखाचा निचरा बाईला करायचा असतो. अबोध मनाच्या पातळीवर हा निचरा करण्यासाठी ती काहीकाळ एका दुसऱ्या भूमिकेत प्रवेश करते. त्याला अंगात येणं असं म्हणतात.

कधी कधी देवी अंगात येण्याचा वापर आपलं घरातलं वा समाजातलं स्थान वाढवण्यासाठीही केला जातो, अशी उदाहरणं आहेत.

झाशीची राणी घोड्यावर बसली आणि...

सांगलीतली ही गाजलेली घटना 1987च्या आसपासची आहे. त्या बाईंचा पुनर्जन्मावर गाढा विश्वास. त्यांच्यात अधूनमधून पूर्वजन्मातील स्मृती जाग्या व्हायच्या. पूर्वजन्मी त्या झाशीची राणी लक्ष्मीबाई होत्या असं त्यांना वाटायचं. त्यावेळी त्यांच्या व्याख्यानाचे कार्यक्रम पार पडत. अंगात झाशीची राणी लक्ष्मीबाई संचारायची.

झाशीच्या राणीवर व्याख्यानं देत असताना त्या खुद्द राणी होऊन जात. बाईंनी वयाची पन्नाशी ओलांडलेली होती. त्यामुळे त्यांच्या वयाचा मान लोक ठेवत, त्यात राणी म्हटल्यावर लोक बेभानपणे ऐकत असत. त्यांच्यातली झाशीची राणी बाहेर कशी काढायची हा अंनिससमोर मोठा प्रश्न होता. अंनिसचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकरांना एक युक्ती सुचली. झाशीच्या राणींना जाहीरपणे घोड्यावर बसवायची.

मच्छिंद्र मुंडे हा किस्सा अगदी जिवंत करुन सांगतात. "बाई स्वतःला झाशीची राणी समजत असल्याने त्यांनी खुल्या मैदानात घोडेस्वारी करायला होकार दिला. उमद्या घोड्याची शोधाशोध सुरू झाली. सांगली-साताऱ्यात मिळेना म्हणून कार्यकर्त्यांनी थेट महालक्ष्मीच्या रेडकोर्सवरुन घोडा ट्रकमधून घालून आणला. तोपर्यंत पत्रकं छापून वाटून झाली होती आणि पेपरमध्ये बातम्याही प्रसिद्ध झाल्या. सरकारी अधिकारीही कार्यक्रमाला उपस्थित होते. खबरदारी म्हणून अॅम्बुलन्सही बोलवण्यात आली होती. गेल्या जन्मी घोडेस्वारी करण्याचा अनुभव असला तरी या जन्मी काहीच सराव नाही, त्यामुळे राणींना दोन-तीन वेळा घोड्यावर बसण्याची मुभा देण्यात येणार होती. ठरल्याप्रमाणे हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत या जन्मीच्या झाशीच्या राणी घोड्यावर बसल्या. पण रेडकोर्सच्या घोड्याने मैदान सोडत कुंपणापलिकडे उडी मारली. क्षणार्धात बाई पडल्या, किरकोळ जखमी झाल्या आणि त्यांना हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं. लोकांसमोर त्याचं भानावर येणं महत्त्वाचं होतं. त्यांना स्क्रिझोफ्रेनियाचा तीव्र मानसिक आजार होता हे उघड झालं, त्यातून उपचार घेऊन त्या पुढे बऱ्याही झाल्या."

अनुभवातून आलेल्या नैराश्य, मानसिक कोंडमाऱ्यामुळे त्यांना झाशीच्या राणीचं रुप उसनं घ्यावं लागलं होतं.

बाह्य स्वरुपात दिसणाऱ्या अंधश्रद्धांच्या मूळाशी मानसिक आजार असल्याची अशी अनेक उदाहरणं आहेत. पण हे महिलांच्याच वाट्याला का येतं?

डॉ. दाभोलकरांनी त्याचं उत्तर आपल्या पुस्तकांमध्ये दिलंय- "आपल्या देशात बाईला जन्माला येण्यापासून ते पुढे जन्मभर एक जीवनव्यापी गौणत्व (किंमत नसणं) सोसावं लागतं. त्याला उत्तर मिळण्याची तिची धडपड बहुदा करुणाजनक पद्धतीने अयशस्वी ठरते. अशी बाई ही भानामतीचा बळी ठरणं ही तिचा नव्हे तर स्त्री-पुरुष विषमतेवर आधारित समाजरचनेचा दोष आहे."

पोलीस आयुक्ताला जेव्हा कळलं आपला मित्र बेघर आहे

लांब जटा, दाढी, मळलेले कपडे आणि वेड्यांसारखं वागणं बघून कुणाला वाटणार पण नाही श्रीजीत यांनी अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलंय. इतकंच काय तर ते भुवनेश्वरचे पोलीस कमिश्नर सुधांशू सारंगी यांचे क्लासमेट होते याची पुसटशीही कल्पना येणार नाही.

सुधांशू सारंगी हे कटक भुवनेश्वरचे पोलीस कमिश्नर आहेत. त्यांच्यासोबत कटकच्या रेवेनसा कॉलेजमध्ये शिकलेले श्रीजीत मात्र बेघर आहेत. कॉलेजमध्ये असताना हे दोघे चांगले मित्र होते.

पुढे दोघांनीही युपीएससीची तयारी केली. सुधांशू हे आयपीएस झाले मात्र श्रीजीत हे या परीक्षेत अपयशी ठरले.

सिव्हिल सर्विस परीक्षेत आलेल्या अपयशाने श्रीजीत खचून गेले आणि हळुहळू त्यांचं मानसिक संतुलन ढासळू लागल्याचं त्यांचे कुटुंबीय सांगतात.

ते रस्त्यावर हिंडू लागले, मळकट कपडे, लांब दाढी आणि केस हेच त्यांचं आयुष्य बनलं.

एकेदिवशी सुधांशू आणि त्यांच्या बॅचमेट्सना आपल्या मित्राबद्दल कळलं. मग त्यांनी श्रीजीत यांना शोधून काढलं. जेव्हा श्रीजीत यांच्या मित्रांनी त्यांना पाहिलं तर त्यांचा विश्वासच बसला नाही.

श्रीजीत यांना पुरी जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिथून त्यांना कटकच्या एससीबी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलच्या मानसिक आरोग्य विभागात पाठवण्यात आलं. सध्या या विभागातच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
परिस्थितीमध्ये सुधारणा

कटकमधल्या हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन अजून एक आठवडाही झाला नाही आणि श्रीजीत यांच्यात बरेच बदल दिसू लागले आहेत. त्यांच्या जटा आता गेल्या आहेत. त्यांची दाढी करण्यात आली आणि त्यांना चांगले कपडे देण्यात आले आहेत.

भेटायला येणाऱ्या मित्रांना ते हसतमुखाने भेटतात. पुढे काय करायचं आहे, या प्रश्नावर श्रीजीत सांगतात, "मला मुलांना शिकवायचं आहे."
श्रीजीत यांच्यासारखं आयुष्य अनेकांच्या वाट्याला

पुरीमध्ये श्रीजीत हे एकटेच उच्चशिक्षित बेघर आहेत असं नाही. त्यांच्यासारख्या अनेकांवर बेघर होण्याची पाळी आली आहे. त्यामुळे शहरात सध्या 'भिकारी मुक्त पुरी' अभियान राबवलं जात आहे. शहरातल्या भिकाऱ्यांचं पुनर्वसन करण्याची जिल्हा प्रशासनाची योजना आहे.

त्यासाठी 'निलाद्री निलय' नावाने खास पुनर्वसन केंद्र बांधण्यात येत आहेत. या पुनर्वसन केंद्रांमध्ये मोफत अन्न, वस्त्र, राहण्याची व्यवस्था, वैद्यकीय सहाय्य आणि इतरही सुविधा पुरवल्या जाणार आहेत. या सर्वांचा खर्च सरकारद्वारे निवड केलेल्या पाच स्वयंसेवी संस्था करत आहेत.

पुरीचे जिल्हाधिकारी बलवंत सिंह यांनी सांगितलं की सरकार या स्वयंसेवी संस्थांना प्रति व्यक्ती 3,400 रुपये प्रति महिना, अर्थसहाय्य पुरवत आहे.

ते सांगतात, "पुरी शहराला हेरिटेज शहर बनवण्यासाठी गेल्या वर्षी एक योजना सुरू करण्यात आली होती. हा देखील त्याचाच एक भाग आहे. वर्ल्ड क्लास हेरिटेज शहरात भिकारी असणं, योग्य वाटत नाही. म्हणूनच आम्ही हे अभियान सुरू केलं आहे. भीक मागणं कायमचं बंद करणं आणि शक्य तेवढ्या लोकांना त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करणं, हा आमचा उद्देश आहे."

पुरी शहरात जवळपास 700 भिकारी असल्याची माहिती जिल्हा सामाजिक सशक्तीकरण अधिकारी त्रिनाथ पाढी यांनी दिली.

भिकाऱ्यांचं वर्गीकरण करून त्यांच्यासाठी उभारण्यात येणाऱ्या पुनर्वसन केंद्रात पाठवण्याआधी त्यांना पुरी शहरातल्या बेघर लोकांसाठीच्या बेस कॅंपमध्ये ठेवलं जातं.

Image copyrightSANDEEP SAHUप्रतिमा मथळाबेस कॅंप

3 मार्चपासून ही मोहीम सुरू झाली आणि पहिल्या पाच दिवसातच बेस कॅंपमध्ये 146 भिकाऱ्यांना आणण्यात आल्याचं कॅंपच्या संचालिका लोपामुद्रा पाईकराय सांगतात. आम्ही देखील या बेस कॅंपला भेट दिली.
धरित्री चॅटर्जी

बेस कॅंपमध्ये असलेल्या भिकाऱ्यांपैकी धरित्री चॅटर्जी यांना भेटून मला आश्चर्याचा जबर धक्का बसला. दिसायला देखण्या, बॉब कट केस आणि अस्खलित इंग्रजी बोलणाऱ्या 54 वर्षांच्या धरित्री चॅटर्जी कुठूनच भिकारी वाटत नव्हत्या. मात्र, कोलकात्यातील कालीघाटच्या राहणाऱ्या धरित्री चॅटर्जी जगन्नाथ मंदिराजवळ भीक मागताना आढळल्या आणि त्यांना या बेस कॅंपमध्ये आणण्यात आलं.

धरित्री सांगतात, "प्रभू जगन्नाथ यांच्याप्रती माझ्या मनात लहानपणापासूनच आकर्षण होतं. आपली सांसारिक जबाबदारी पूर्ण केल्यानंतर मी गेल्यावर्षी मे महिन्यात 'फोनी' चक्रवादळाच्या काळात पुरीला आले आणि मग इथेच स्थायिक झाले."

Image copyrightSANDEEP SAHUप्रतिमा मथळाधरित्री चॅटर्जी

त्यांच्याशी बोलताना जाणवलं की आध्यात्मिक कारणाव्यतिरिक्त इथे येण्यामागे काही कौटुंबिक कारणही असावं. मात्र, आपल्या कुटुंबाविषयी उघडपणे बोलण्याची त्यांची इच्छा दिसली नाही. त्यामुळे मग मीही अधिक खोलात विचारपूस केली नाही.

आपलं लग्न झालं आहे आणि आपल्याला 22 वर्षांचा मुलगा आहे, एवढं मात्र, त्यांनी सांगितलं. धरित्री शास्त्रीय संगीत शिकल्या आहेत आणि वेल्लोरमधल्या सीएमसी हॉस्पिटलमध्ये त्यांनी कामही केलं आहे.
लक्ष्मीप्रिया मिश्र

धरित्री चॅटर्जी आणि श्रीजीत पाढी यांच्याप्रमाणेच उच्च शिक्षणानंतर भीक मागणाऱ्यांपैकी एक नाव आहे लक्ष्मीप्रिया मिश्र.

Image copyrightSANDEEP SAHU

धरित्री यांच्यासारखंच लक्ष्मीप्रिया यांनाही अस्खलित इंग्रजी येतं. संस्कृतचे अनेक श्र्लोकही त्यांना मुखोद्गत आहेत.

त्यांच्याकडे बघून कुणी म्हणणार नाही की पुरी बालिका विद्यालयात शिक्षिका म्हणून काम केलेल्या या महिलेने कधीकाळी गुजरात आणि इथियोपियातल्या मुलांना भौतिक शास्त्र, रसायन शास्त्र आणि गणित शिकवलं असेल.

आपला एकमेव मुलगा गमावल्यानतंर त्यांचं मानसिक संतुलन ढासळलं आणि त्या भीक मागू लागल्या.

लक्ष्मीप्रिया सांगतात, "माझ्या कुटुंबात फक्त माझा एक तरुण मुलगा होता. सात वर्षांपूर्वी एक दिवस तो अचानक गायब झाला आणि अजून परतलेला नाही. तो जिवंत आहे की नाही, हेसुद्धा मला माहिती नाही."

लक्ष्मीप्रिया यांची दृष्टीही अधू झाली आहे. पुरी इथल्या लायन्स क्लबच्या कार्यकर्त्यांनी त्यांना उपचारासाठी भुवनेश्वरमधल्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे.

Image copyrightSANDEEP SAHUप्रतिमा मथळालक्ष्मीप्रिया मिश्र

'भिकारी मुक्त पुरी' मोहिमेतील कार्यकर्ते सांगतात की मोहिमेच्या पाच दिवसांच्या आतच त्यांना उच्च शिक्षित असलेले एक डझनहून अधिक भिकारी आढळले. यातलंच एक नाव आहे गिरीजा शंकर मिश्र. गिरीजा शंकर मिश्र यांनी प्लास्टिक इंजीनिअरिंगमध्ये डिप्लोमा केला आहे.
उच्च शिक्षित असूनही का मागतात भीक?

मोहिमेचे सल्लागार सिद्धार्थ रॉय म्हणतात, "याची अनेक कारणं असू शकतात. ठरवलेलं लक्ष्य आणि हाती आलेलं यश यात मोठा फरक, हेदेखील एक कारण असू शकतं. जेव्हा एखाद्याला वाटतं की आपल्या पात्रतेनुसार आपल्याला फळ मिळत नाही, अशावेळी तो हताश होतो. श्रीजीत पाढी यांचा अशाच श्रेणीत समावेश होऊ शकतो."

रॉय यांच्या मते यामागे दुसरं कारण आपली कौटुंबिक, सामाजिक आणि वर्षानुवर्ष चालत आलेली व्यवस्था हेदेखील असू शकतं. यामुळे एखाद्या व्यक्तीची सामान्य आयुष्य जगण्याची इच्छाच नाहिशी होते.

ते म्हणतात, "काही लोक आध्यात्मिक कारणामुळेही असं करतात. हिंदू धर्मात भिक्षुगिरीला धार्मिक मान्यता आहे. यात काही एस्केपिस्ट (पलायनवादी) आहेत, हेही वास्तव आहे."

Image copyrightSANDEEP SAHU

मात्र, उत्कल विद्यापीठातील मानसोपचार विभागाचे निवृत्त प्राध्यापक प्रताप रथ वेगळंच कारण सांगतात.

ते म्हणतात, "आपल्या समाजात डिग्निटी ऑफ लेबर म्हणजे श्रमाचा मान राखला जात नाही. पाश्चिमात्य विकसित राष्ट्रांमध्ये एखाद्या विद्यापीठात शिकवणारा प्राध्यापकदेखील रिकाम्या वेळेत टॅक्सी चालवतो किंवा एखाद्या हॉटेलमध्ये काम करतो. आपल्या समाजाप्रमाणे तिथला समाज याकडे तुच्छतेने बघत नाही. भारतात एखाद्या व्यक्तीला जेव्हा असं वाटतं की त्याला त्याच्या योग्यतेप्रमाणे काम, नाव किंवा प्रतिष्ठा मिळत नाही तेव्हा तो हताश होतो आणि मग तो समाज काय म्हणेल, ही चिंता करणं सोडतो. याच कारणामुळे भीक मागणाऱ्यांमध्ये उच्चविद्याविभूषित लोक आढळणं, आश्चर्याची बाब नाही."