Translate

गुरुवार, २९ जानेवारी, २०१५

'राष्ट्रीय रक्तसंक्रमण परिषद'ने देशात महाराष्ट्राचे 'मॉडेल'

गेल्या दशकभरात महाराष्ट्राने ऐच्छिक रक्तदानात देशात घेतलेली आघाडी कायम असून गेल्या वर्षभरात तब्बल १५ लाख ५९ हजार ६६९ रक्ताच्या पिशव्या जमवून स्वत:चाच यापूर्वीचा विक्रम मोडला आहे. महत्त्वाचे म्हणजे जमा केलेल्या एकूण रक्तापैकी सुमारे ९५ टक्के रक्त हे ऐच्छिक रक्तदानाच्या माध्यमातून जमा करण्यात आले असून महाराष्ट्राचा पराक्रम संपूर्ण देशासाठी प्रेरक ठरणारा आहे. रक्तदान क्षेत्रातील महाराष्ट्राच्या प्रगतीचा आढावा घेऊन 'राष्ट्रीय रक्तसंक्रमण परिषद'ने देशात महाराष्ट्राचे 'मॉडेल' देशभर वापरण्याचा निर्णय घेतला आहे. 
महाराष्ट्रात गेल्या वर्षभरात स्वयंसेवी संस्था, महाविद्यालये, रेल्वे स्थानके अशा ठिकाणी तसेच उद्योग जगताबरोबरच राजकीय नेते आणि धार्मिक क्षेत्रातील व्यक्तिंच्या सहभागाने 'राज्य रक्तसंक्रमण परिषद'ने तब्बल २४ हजार ६४७ रक्तदान शिबिरांचे आयोजन केले. त्यात पंधरा लाखांहून अधिक रक्ताच्या पिशव्या जमा झाल्या असून देशातील कोणत्याही राज्यात याच्या निम्म्यानेदेखील रक्त जमा होऊ शकलेले नाही. एकेकाळी ऐच्छिक रक्तदानात पश्चिम बंगालची 'दादागिरी' होती. तथापि गेले दशकभर 'राज्य रक्तसंक्रमण परिषदे'च्या अथक प्रयत्नांतून महाराष्ट्राने देशात सर्वप्रथम येण्याचा मान टिकवला आहे. जानेवारी ते डिसेंबर २०१४ या कालावधीत हे रक्त जमा करण्यात आले आहे. आरबीसी, प्लेटलेटस्, प्लाझ्मा आदी रक्तघटक वेगळे केल्यामुळे देशातील कोणत्याही राज्याला आवश्यकतेनुसार रक्तपुरवठा करण्याची क्षमता राज्याकडे निर्माण झाल्याचे रक्त संक्रमण परिषदेचे साहाय्यक संचालक डॉ. संजयकुमार जाधव यांनी सांगितले. 
राज्यात ३१० रक्तपेढय़ा असून त्यापैकी ७५ शासकीय व निमशासकीय रक्तपेढय़ा आहेत. गेल्या वर्षभरात शासकीय तसेच महापालिकांच्या रुग्णालयातील साडेतील लाख रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी यातून मोफत रक्त उपलब्ध झाले. राज्यात रक्तघटक विलगीकरणाची २४४ ठिकाणी व्यवस्था असून टक्केवारीच्या भाषेत सांगायचे झाल्यास संपूर्ण देशात जमा होणाऱ्या रक्तापैकी केवळ २० टक्के रक्ताचे विलगीकरण होते तर महाराष्ट्राचे प्रमाण देशाच्या तुलनेत ६५ टक्के एवढे आहे.

चालता चालता मोबाइल चार्ज!

तुम्ही प्रवासात आहात. एक महत्त्वाचा फोन करायचा आहे, पण मोबाइलची बॅटरी पूर्णपणे 'डाऊन' झाली आहे.. अशा परिस्थितीत काय करू नि काय नको, अशी आपली अवस्था होते. पण लवकरच तुमची ही समस्या मिटणार आहे. तुम्ही जितके अंतर चालाल, तितकी अधिक वीजनिर्मिती करणारे एक तंत्रज्ञान रॉयल महाविद्यालयातील बारावीच्या विद्यार्थ्यांनी विकसित केले आहे. चपलेत बसवलेल्या प्लेट्सच्या मदतीने पिझो इलेक्ट्रिसिटी पद्धतीने वीजनिर्मिती करणारा हा प्रकल्प भविष्यात केवळ मोबाइलच नव्हे तर, अनेक इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांसाठी 'ऊर्जादायी' ठरणारा आहे. 

डोंबिवली युवक एज्युकेशनल ट्रस्ट संचालित रॉयल महाविद्यालयातील बारावीच्या विज्ञान विभागातील इलेक्ट्रिकल विषयातील सूरज तिवारी आणि हर्षित राय या विद्यार्थ्यांनी साकारलेला हा प्रकल्प येत्या गुरुवारी २९ जानेवारीला होणाऱ्या तालुकास्तरीय प्रदर्शनात मांडण्यात येणार आहे. बारावीच्या पुस्तकातील 'पिझो इलेक्ट्रिसिटी'विषयीच्या माहितीच्या आधारे शिक्षक नलीन मौर्य यांच्या मार्गदर्शनाखाली या दोघांनी हे तंत्रज्ञान तयार केले आहे. 
प्रत्येक व्यक्ती दिवसाला सरासरी ७ हजार फूट चालते. ती ऊर्जा या संयंत्रात वापरण्यात आली आहे. चपलेत बसविण्यात आलेल्या प्लेटस्वर चालल्यानंतर दाब येताच त्यातून निर्माण होणाऱ्या विजेचे एसी टू डीसीमध्ये रूपांतर करून ती साठवून ठेवली जाते. प्रत्येक पावलाला ३० व्होल्टची वीजनिर्मिती होते, असे या तंत्रज्ञानाचे स्वरूप आहे. विशेष म्हणजे, चपलेतील सोलच्या खाली प्लेट्स टाकून अशी 'वीजनिर्मिती' सुरू करता येत असल्याने त्यासाठी कोणत्याही विशेष चपलांची वा बुटांची गरज नाही. 'विद्यार्थ्यांनी तयार केलेले हे प्रकल्प खरोखरच वाखाणण्यासारखे असून त्यांच्या कल्पनाशक्तीला सलाम आहे. त्यांच्या या प्रेरणेने आम्हा शिक्षकांनाही एक वेगळीच ऊर्जा मिळते. त्यांना आम्ही सदैव सहकार्य करत राहू,' असे महाविद्यालयाचे प्रा. डी. एच. तिवारी यांनी सांगितले.

'स्मार्ट फोनचा वापर हल्ली वाढला आहे, मात्र बॅटरी चार्जिग ही त्यातील सर्वात मोठी समस्या आहे. त्यामुळे 'पिझो' तत्त्वाद्वारे वीजनिर्मिती करून त्यावर उपाय शोधावा, या विचाराने हा प्रकल्प आम्ही साकारला. केवळ चप्पलपुरतेच मर्यादित न राहता रस्त्यावरील वाहने, नृत्याचे व्यासपीठ, पदपथ, जॉिगग ट्रॅक याबरोबरच रेल्वे स्थानक येथे हजारो प्रवासी दररोज चालतात. त्यातून निर्माण होणारी ऊर्जाही आपल्याला यात वापर करता येईल.'