Translate

शुक्रवार, १५ मे, २०१५

ऊंची वाढवणे.......

साधारणतः पौगंडावस्था पूर्ण होईपर्यंत उंचीमध्ये वाढ होत असते. म्हणजे मुलींमध्ये 15-16 वर्षांनंतर व मुलांमध्ये 18-20 वर्षांनंतर उंची वाढण्याची प्रक्रिया थांबते. मुलींमध्ये पाळी सुरू झाली की नंतर उंचीमध्ये सहसा फारसा फरक पडत नाही. अर्थातच उंची वाढवण्यासाठी आधीच प्रयत्न करणे भाग असते. वास्तविक उंचीचे मूळ हे गर्भावस्थेत रोवले जाते. त्यामुळे गर्भधारणेच्या आधीपासून स्त्री-पुरुषांनी धातुपोषणाकडे व्यवस्थित लक्ष दिलेले असेल, तर बाळाचे वजन व उंची व्यवस्थित वाढते, असा अनुभव आहे.
व्यक्‍तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे उंची. अर्थात शरीरबांधा आणि उंची यांचा समतोल असला, तरच उंची शोभून दिसते. शरीर सात धातूंपासून बनलेले आहे, हे आपण जाणतो. यातील अस्थी धातूवर म्हणजेच हाडांवर उंची अवलंबून असते व ती शोभून दिसण्यासाठी मांस-मेद धातूंना व्यवस्थित पोषण मिळण्याकडेही लक्ष ठेवावे लागते.
प्रकृतिपरीक्षणामध्ये उंची हा मुद्दा महत्त्वाचा असतो. वातप्रकृतीच्या व्यक्‍ती सहसा एक तर फार उंच व बारीक तरी असतात किंवा फार बुटक्‍या व अनियमित शरीरठेवणीच्या असतात. पित्तप्रकृतीच्या व्यक्‍ती साधारण मध्यम उंचीच्या व मध्यम बांध्याच्या असतात, तर कफप्रकृतीच्या व्यक्‍ती धिप्पाड, उंचीच्या मानाने वजन जरा जास्ती असणाऱ्या असतात. उंचीवर प्रकृतीइतकाच आनुवंशिकतेचाही प्रभाव असतो, तसेच लहानपणापासून धातुपोषणाकडे लक्ष देण्याचाही उंची वाढण्यावर परिणाम होत असतो.
साधारणतः पौगंडावस्था पूर्ण होईपर्यंत उंचीमध्ये वाढ होत असते. म्हणजे मुलींमध्ये 15-16 वर्षांनंतर व मुलांमध्ये 18-20 वर्षांनंतर उंची वाढण्याची प्रक्रिया थांबते. मुलींमध्ये पाळी सुरू झाली की नंतर उंचीमध्ये सहसा फारसा फरक पडत नाही.
अर्थातच उंची वाढवण्यासाठी आधीच प्रयत्न करणे भाग असते. वास्तविक उंचीचे मूळ हे गर्भावस्थेत रोवले जाते. त्यामुळे गर्भधारणेच्या आधीपासून स्त्री-पुरुषांनी धातुपोषणाकडे व्यवस्थित लक्ष दिलेले असेल, तर बाळाचे वजन व उंची व्यवस्थित वाढते असा अनुभव आहे.
गर्भधारणेच्या काळात गर्भवतीने लोह, हिमोग्लोबिन, कॅल्शियम योग्य मात्रेमध्ये व नैसर्गिक स्वरूपात सेवन करणेही उंचीच्या दृष्टीने महत्त्वाचे होय. रासायनिक द्रव्यांपासून बनविलेली औषधे आतमध्ये हाडांपर्यंत तसेच हाडांचे पोषण करणाऱ्या मज्जेपर्यंत पोचू शकतातच असे नाही, त्यापेक्षा नैसर्गिक अन्न व औषधातून ही तत्त्वे शरीरात सहजपणे स्वीकारली जातात व त्यामुळे उंची नीट वाढण्यास, एकंदरच सर्व शरीराचे पोषण होण्यास मदत मिळते.
उंचीला पूरक उपाय 
जन्मानंतरही वाढत्या वयात आहारात दूध, घरी बनवलेले साजूक तूप, लोणी, पंचामृत, गहू, खारीक, खसखस, बाभळीच्या डिंकाची लाही या सर्व गोष्टी असल्या तर त्यामुळे उंची नीट वाढण्यास मदत मिळू शकते. उंचीला पूरक असे साधे, पण प्रभावी उपाय पुढीलप्रमाणे सांगता येतील,


•सकाळी व संध्याकाळी कपभर गरम दूध खारकेचे चूर्ण टाकून घेणे. तसेच सर्व धातुपोषक औषधद्रव्यांपासून तयार केलेला "शतावरी कल्प' किंवा "संतुलन चैतन्य कल्प' दुधात टाकून घेणे. 

•रोज सकाळी एक-दोन चमचे घरी बनवलेले ताजे लोणी साखर टाकून घेणे. 

•आहारात रव्याची खीर, गव्हाच्या पिठाचा शिरा, गव्हाची खीर यांचा अधूनमधून समावेश असणे. 

•डिंकाची लाही, खारीक, बदाम वगैरे शक्तिवर्धक व हाडांना पोषक द्रव्यांपासून तयार केलेला डिंकाचा लाडू किंवा अश्‍वगंधा, मुसळी वगैरे घटक असलेले "मॅरोसॅन' हे रसायन सेवन करावे. 

•वात संतुलन करणाऱ्या व धातुपोषण करणाऱ्या औषधांनी सिद्ध तेलाचा अभ्यंग करणे. 

•प्रकृतीचा विचार करून दिलेल्या मोती भस्म, प्रवाळ भस्म, शौक्तिक भस्म वगैरे औषधांचाही वयाच्या मर्यादेत उंची वाढवण्यासाठी चांगला उपयोग होताना दिसतो, यासाठी तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला अवश्‍य घ्यावा.


हाडे करा बळकट 
तारुण्यावस्थेत पोचेपर्यंत जी उंची वाढते, ती नंतर वाढत्या वयानुसार म्हणजे साधारणतः चाळिशीनंतर थोडीशी कमी होऊ लागते. याचे कारण असते वयानुसार हाडांची थोड्या प्रमाणात झीज होणे, विशेषतः पाठीचे मणके झिजणे. त्यामुळे पस्तिशीनंतर हाडांच्या आरोग्याकडे लक्ष ठेवले, पाठीच्या कण्याला कुंडलिनी तेलासारखे तेल लावण्याची सवय ठेवली तर वयानुसार उंची घटण्याचे प्रमाण कमी करता येते.

लहानपणापासून ताठ बसण्याची, ताठ उभे राहण्याची सवय सुद्धा उंचीसाठी पूरक असते. लहानपणापासून योगासने, सूर्यनमस्कारांचा सराव केल्याने सुद्धा शरीराच्या एकंदर परिपूर्ण वाढीला पाठबळ मिळते, उंची वाढण्यास कारणीभूत संप्रेरक स्रवण्यास उत्तेजना मिळू शकते. 
दोरीवरच्या उंच उड्या, सिंगल बार, डबल बार म्हणजेच लटकण्याचे व्यायाम उंची वाढण्यास उपयोगी असतात. याखेरीज उंची वाढण्यासाठी सहायक म्हणून योगासने व संतुलन क्रियायोगापैकी पुढील क्रिया सुचवता येतील,


स्थैर्य 
स्थैर्य क्रियेच्या अभ्यासाने मानेला व पाठीला व्यायाम मिळतो व मेरुदंड लवचिक होतो, पिच्युटरी ग्रंथी कार्यान्वित होते, पचनक्रियेत सुधारणा होते. तसेच दीर्घ व लांब श्‍वासोच्छ्वास करायची सवय लागते. या क्रियेच्या अभ्यासाने सजगता वाढते व व्यक्तीला स्थैर्य मिळते.


•ही क्रिया जास्तीत जास्ती सात वेळा करावी. 

•दोन्ही टाचांमध्ये सुमारे 15-20 सें.मी. तर दोन्ही चवड्यांमध्ये 25-30 सें.मी. अंतर ठेवून ताठ उभे राहावे. हात शरीरालगत सरळ ठेवावेत व हाताच्या मुठी वळलेल्या असाव्यात. 

•पाय जमिनीवर घट्ट रोवावेत. 

•श्‍वास आत घेत, दोन्ही पायांच्या टाचा वर उचलून पायांच्या चवड्यांवर उभे राहावे. टाळूला दोर बांधून आपल्याला जणू कोणी वर ओढत आहे, अशी कल्पना करावी. 

•पोट आत व वर ओढून श्‍वास आत कोंडून धरावा. या वेळी लक्ष सहस्राधार चक्रावर केंद्रित करावे. शक्‍य तितका वेळ या स्थितीत राहावे. 

•श्‍वास हळू हळू बाहेर सोडत, पोटावरचा ताण कमी करून टाचा जमिनीला टेकवत खाली यावे.


विस्तारण 
या क्रियेच्या अभ्यासाने पाठीचा कणा सरळ व्हायला मदत मिळते. कंबरेच्या भागाला बळकटी येते, वायू सहजपणे सरायला मदत होते, तसेच पचनशक्ती सुधारते, थायरॉईड ग्रंथीच्या कार्यावर नियंत्रण येते व फुप्फुसांमधे शक्तिसंचार होतो. मेंदूला उत्तेजना मिळते, संवेदनशीलता वाढते, विस्तार व बदल या दोन मूलभूत गोष्टींची पूर्तता होते.

ही क्रिया पुढीलप्रमाणे करता येते-
•वज्रासनात बसावे, पुढे वाकून पोटावर झोपावे. दंड जमिनीला लंब ठेवून कोपरे जमिनीला टेकवावेत, तर्जनी कानाच्या मागे व उरलेली तीन बोटे गालावर ठेवून दोन्ही हात असे ठेवावेत की हनुवटी तळव्यांना चिकटलेली नसेल. दृष्टीसमोर असावी. स्नायूवर ताण येऊ न देता डोळे वटारल्यासारखे मोठे करावे. 
•तोंडाचा मोठा आ करावा. या वेळी अजगर जणू आपले भक्ष्य आकर्षून घेत आहे अशी कल्पना करावी. 
•सावकाशपणे एका संथ लयीत श्‍वास घ्यावा व सोडावा आणि असे करताना श्‍वास आत घेतल्याचा व बाहेर सोडल्याचा फुसकारल्यासारखा आवाज यावा, अशी 10-12 (सुमारे एक मिनिट) आवर्तने करावीत. 
•श्‍वासोच्छ्वास पूर्ण झाल्यावर कुठल्या बाजूच्या नाकपुडीने श्‍वास चालू आहे हे पाहावे. 
•ज्या बाजूच्या नाकपुडीने श्‍वास चालू आहे ती नाकपुडी वरच्या बाजूला येईल अशा तऱ्हेने डोके जमिनीवर ठेवावे. हात कोपऱ्यातून काटकोनात वाकवून डोक्‍याच्या दोन्ही बाजूला ठेवावे, हातांचे तळवे जमिनीला टेकलेले असावे, पाय शिथिल असावेत. 
•डोळे बंद करून शरीरातील सर्व अवयवात प्राणशक्तीचा संचार होत आहे, अशी कल्पना करावी व हळूहळू सर्व शरीर शिथिल करावे. या वेळी आपल्या शरीराचा विस्तार झाला आहे असा अनुभव येतो. 
•थोड्या वेळाने डोळे उघडून वज्रासनात यावे व नंतर उभे राहावे.


धनुरासन 
या आसनाच्या अभ्यासाने पाठीच्या कण्याची व पाठीच्या स्नायूंची लवचिकता वाढते व मज्जातंतूंना बळकटी मिळते. भुजंगासन व शलभासन या दोन्ही आसनांचा यामुळे लाभ होतो.

•पोटावर झोपावे, पाय एकमेकाला जुळलेले असावेत. हात शरीरालगत सरळ ठेवावेत, हाताचे तळवे आकाशाच्या दिशेला असावेत. कपाळ जमिनीला टेकलेले असावे. 
•पाय गुडघ्यात वाकवून पायांच्या टाचा नितंबाजवळ आणाव्यात. 
•दोन्ही गुडघ्यात थोडे अंतर ठेवून हातांनी पायाचे घोटे पकडावेत. घोटे पकडताना हाताचे अंगठे आतल्या बाजूला व इतर चार बोटे बाहेरच्या बाजूला असावीत. तसेच दोन्ही पायांचे अंगठे एकमेकांना टेकलेले असावेत. 
•पाय व डोके हळूहळू जास्तीत जास्ती वर उचलावे, हात कोपरात सरळ असावेत. 
•स्थितीत संपूर्ण शरीराचा भार नाभीभोवतीच्या भागावर येईल. आपल्या क्षमतेनुसार या स्थितीत राहावे. 
•हातांनी पकडलेले घोटे साडून दोन्ही हात, छाती व डोके जमिनीला टेकवून पूर्वस्थितीला यावे. पोटावर थोडा वेळ आरामात झोपून राहावे.

गुरुवार, ७ मे, २०१५

राजर्षी शाहू महाराज. .

संस्थानाधिपती पददलितांचे कैवारी राजर्षी शाहू महाराज यांची ६ मे रोजी १०३ वी पुण्यतिथी आहे. एक संस्थानाधिपती यापेक्षा महाराष्ट्रातील बहुजन समाजाचे महान नेते, हीच त्यांची खरी ओळख आहे. येथील बहुजन समाजासाठी त्यांनी केलेल्या कार्यामुळे बहुजन समाजाने त्यांना आपले दैवतच मानले आहे.
राजर्षी शाहू महाराजांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कागलच्या घाटगे घराण्यात झाला. त्यांचे जन्मठिकाण कोल्हापूर येथील राजवाड्यात असून हे स्थळ आता विश्रामधाम म्हणून ओळखले जाते. त्यांचे मूळ नाव यशवंतराव असे होते. वडिलांचे नाव जयसिंगराव घाटगे, तर आईचे नाव राधाबाईसाहेब असे होते. कोल्हापूर संस्थानचे राजे चौथे शिवाजी यांना इंग्रजांनी वेडसर ठरवून अहमदनगर जिल्ह्यात कैदेत ठेवले होते. तेथेच त्यांचा दुर्दैवी अंत झाला. त्यांना औरसपुत्र नसल्याने त्यांच्या पत्नी आनंदीबाईनी शाहू महाराजांना दत्तक घेतले. शाहू महाराजांचे प्रारंभीचे शिक्षण खासगी शिक्षकामार्फत झाले. पुढील राजकुमारांसाठी असलेल्या कॉलेजमध्ये पाठविण्यात आले. परतल्यावर त्यांनी युरोपियन शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली राज्यकारभार, इतिहास, इंग्रजी, भाषा इ. शिक्षण घेतले. संस्कृत भाषेचेही त्यांनी अध्ययन केले.
शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानाची अधिकारसूत्रे आपल्या हाती घेतल्यानंतर संस्थानात दौरा काढून संस्थानाची राज्यव्यवस्था व प्रजेची स्थिती यांची जातीने पाहणी केली. यावेळी आपल्या प्रजेची हलाखीची स्थिती पाहून आपल्या हाती आलेल्या सत्तेचा वापर प्रजेच्या कल्याणासाठी करण्याचा त्यांनी मनोमन निश्चय केला व पुढे तो आयुष्यभर प्रत्यक्षातही उतरविला.
शाहू महाराजांच्या काळात बहुजन समाज शिक्षणापासून वंचित राहिला होता. शिक्षण ही फक्त वरिष्ठ वर्गाचीच मक्तेदारी समजली जात होती. बहुजन समाजाच्या मागासलेपणाचे एक कारण त्यांच्यातील शिक्षणाचा अभाव हे होय, ही गोष्ट शाहू महाराजांनी ओळखली. बहुजन समाजात शिक्षणाचा प्रसार घडवून आणण्याच्या कार्याला त्यांनी प्राधान्य दिले. महाराजांनी विद्यार्थ्यांची गरज ओळखून त्यांच्यासाठी वसतिगृहांची स्थापना केली. कारण त्या काळी शिक्षणाच्या सोयी फक्त शहरातच उपलब्ध होत्या. ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोक अतिशय हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत होते. आपल्या मुलांना शिक्षणासाठी शहराच्या ठिकाणी पाठविण्याची कुवत त्यांच्यात नव्हती त्यामुळे गोरगरीब मुलांना शिक्षण घेता यावे यासाठी शहरात त्यांच्या राहण्याची अल्पखर्चात व्यवस्था व्हावी म्हणून महाराजांनी वसतिगृहांची स्थापना केली. वसतिगृहात सर्व जातिधर्मांच्या मुलांना प्रवेश दिला. महाराजांनी बहुजन समाजातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्त्या देऊन त्यांना शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले. शाहू महाराजांनी शिक्षण क्षेत्रात राबविलेली ‘सक्तीचे व मोफत प्राथमिक शिक्षण योजना’ हे एक क्रांतिकारक पाऊल होते. स्त्रियांच्या शिक्षणासाठीही त्यांनी सहकार्य केले. स्त्रीशिक्षणासाठी एक खास अधिकारीपद निर्माण करून ‘स्त्री शिक्षण अधीक्षिका’ म्हणून मिस लिटन यांची नेमणूक केली. अकाली वैधव्य आलेल्या आपल्या सुनेला, राणी इंदुमतीला शाहूंनी आपल्या देखरेखीखाली शिकवले. आपल्या सुनेने डॉक्टर व्हावे अशी त्यांची इच्छा होती.
पददलित व मागासलेल्या वर्गाची उन्नती हे शाहू महाराजांनी आपले जीवितकार्य मानले होते. अस्पृश्यांवरील अन्यायाचे निवारण करण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असत. अस्पृश्य विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून कोल्हापुरात ‘मिस क्लार्क बोर्डिंग’ या नावाचे त्यांनी एक वसतिगृह उभारले. त्यांनी अस्पृश्यांना स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन दिले. अस्पृश्यांना समाजात मानाने जगता यावे म्हणून त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवून दिल्या. अस्पृश्यांना शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती अशा ठिकाणी समानतेने वागवावे असे आदेश त्यांनी दिले होते. अस्पृश्यांची गुलामगिरी नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांनी आपल्या राज्यातील महार वतने रद्द केली आणि जमिनी अस्पृश्यांच्या नावावर रयतवारीने करून दिल्या. तसेच त्यांनी अस्पृश्यांसमवेत सहभोजने आयोजित केली. या कार्यामुळे बहुजन समाजाने त्यांना आपले दैवत मानले.
शाहू महाराजांचा समाजसुधारणेच्या बाबतीतील दृष्टिकोन अत्यंत पुरोगामी होता. जातिभेदाला त्यांचा तीव्र विरोध होता. जातिभेद नष्ट झाल्याशिवाय आपल्या समाजाची उन्नती होणार नाही, असे त्यांचे मत होते. जातिव्यवस्था घालवण्यासाठी त्यांनी आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. पुनर्विवाहाचा कायदा करून विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. देवदासींची प्रथा बंद करून स्त्रियांना क्रूरपणे वागवण्याच्या प्रवृत्तीस आळा घातला.
महात्मा फुले यांच्यानंतर निष्प्राण होत चाललेल्या सत्यशोधक चळवळीला संजीवनी देऊन त्यांनी तिच्यात नवचैतन्य निर्माण केले. बहुजन समाजाची अस्मिता जागृत केली. सामाजिक चळवळीतील महात्मा फुले यांचे वारसदार शाहू हेच होते.
शाहूंच्या जीवनातील वेदोक्त प्रकरण खूप महत्त्वाचे ठरले. त्यामुळे महाराष्ट्रात ब्राह्मण व ब्राह्मणेतर हा जो वाद धुमसत होता, तो बाहेर पडला. महाराजांच्या पदरी असलेल्या एका पुरोहिताने म्हटले की, ‘आपण क्षत्रिय नसल्यामुळे आपणासाठी वैदिक मंत्र म्हणण्याची गरज नाही. शूद्रांना पुराणोक्त पद्धतीने अनुग्रह करावयाचा असतो.’ या पुरोहिताच्या उर्मटपणामुळे शाहूंना वाटले जर छत्रपती असूनही वेदोक्त मंत्रापासून व आदरापासून आपणाला वंचित ठेवले जाते, तर सामान्य माणसाची काय अवस्था असेल? यानंतर शाहू ब्राह्मण-ब्राह्मणेतर चळवळींकडे वळले. पुरोहित बहुजनांची पिळवणूक करतात. त्यामुळे आपल्याच लोकांकरवी लग्न, मुंज, श्रावणी हे विधी करावेत यासाठी त्यांनी धर्मविधी कसे पाळावेत याचे सशस्त्र शिक्षण देणारी शाळा काढली. ब्राह्मणेतर चळवळीचे लोण शाहूंनी खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचवले. बहुजन समाजाला राजकीय हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी निपाणी येथे डेक्कन रयत असोसिएशन या संस्थेची स्थापना केली. शाहू महाराजांनी बहुजन समाजाच्या हिताचा ध्यास घेतला होता. आणि त्यासाठी कोणताही त्याग करण्याची त्यांची तयारी होती.
आपल्या राज्याच्या आर्थिक प्रगतीसाठीही शाहूंनी अनेक कार्ये हाती घेतली. त्यांनी शाहू छत्रपती ‘स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल’ची स्थापना केली. राधानगरी धरणाची उभारणी करून शेतीस प्रोत्साहन दिले. दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांच्या जमिनी सावकारांकडे गहाण पडल्या होत्या. त्या सोडवण्यासाठी त्यांना कर्जे उपलब्ध करून दिली. शाहू महाराज आयुष्यभर आपल्या राज्यातील प्रजेच्या विकासासाठी प्रयत्नशील राहिले. त्यांच्या सुधारणा क्रांतिकारक व मूलगामी स्वरूपाच्या होत्या.