Translate

सोमवार, १७ ऑगस्ट, २०१५

महाराष्ट्रात 22 नव्या जिल्ह्यांचा प्रस्ताव, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवारांची माहिती

मुंबई : महाराष्ट्रात नवीन 22 जिल्हे आणि 49 तालुक्यांच्या निर्मितीबाबत राज्य सरकारने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्यात आली आहे. त्यामध्ये वित्त, महसूल नियोजन विभागाचे सचिव, विभागीय आयुक्त यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांचा समावेश आहे. 

समितीला 31 डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बुलडाणा जिल्ह्याचे विभाजन करुन घाटाखालील मलकापूर, नांदुरा, जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव खामगाव या सहा तालुक्यांचा समावेश खामगाव जिल्ह्यात केला जाणार आहे.

राज्यात 1988 नंतर दहा जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली आहे. सध्या 36 जिल्हे 288 तालुके आहेत. मात्र सध्या अस्तित्वात असलेले जिल्हे तसेच काही तालुक्यांची ठिकाणे भौगोलिकदृष्ट्या गैरसोयीची असल्याचे सांगून विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जनतेच्या मागणीनुसार जिल्हा तालुकानिर्मितीची मागणी केली आहे.

एका जिल्हा निर्मितीसाठी तब्‍बल 350 कोटी खर्च

महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या दालनात या संदर्भात बुधवारी एक बैठकही पार पडली. एका जिल्ह्याच्या निर्मितीसाठी किमान 350 कोटी रुपये खर्च येतो. राज्य सरकारवर सध्या तीन लाख कोटींहून अधिक कर्ज आहे. अशा परिस्थितीत जिल्हानिर्मितीवर खर्च करणे शक्य नसतानाही सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची मागणी असल्याने सरकारने 22 नवीन जिल्हे निर्मितीच्या दिशेने पाऊल टाकले आहे.

अचलपूरसाठीही पाठपुरावा

सध्या अस्तित्वात असलेल्या 18 जिल्ह्यांचे विभाजन करुन 22 नवीन जिल्हे निर्माण करण्याबाबत नेत्यांनी काँग्रेस आघाडी सरकारला पत्रे पाठवली होती. आता राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार आल्यानंतर अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी अचलपूर जिल्हानिर्मितीसाठी पाठपुरावा सुरु ठेवला आहे.

प्रस्तावित नवीन जिल्हे

बुलडाणा(खामगाव)
यवतमाळ (पुसद)
अमरावती (अचलपूर)
भंडारा (साकोली)
चंद्रपूर (चिमूर)
गडचिरोली (अहेरी)
जळगाव (भुसावळ)
लातूर (उदगीर)
बीड (अंबेजोगाई)
नांदेड (किनवट)
अहमदनगर (शिर्डी, संगमनेर, श्रीरामपूर)
नाशिक (मालेगाव, कळवण)
सातारा (मानदेश)
पुणे (शिवनेरी)
पालघर (जव्हार)
ठाणे (मीरा भाईंदर, कल्याण)
रत्नागिरी (मानगड)
रायगड (महाड)

बुधवार, १२ ऑगस्ट, २०१५

राधे माँ

बोरीवली येथील निकी गुप्ता या महिलेने राधे माँ या स्वयंघोषित अध्यात्मिक गुरूच्या विरोधात कौटुंबिक छळ होत असल्याचा आरोप केल्यानंतर राधे माँ अचानक प्रकाशझोतात आल्या. उच्चभ्रू वर्गामध्ये अमाप भक्तगण जमविणाऱ्या राधे माँ यांचे प्रस्थ मोठे असल्याचे बोलले जाते. काय आहे हे प्रकरण? 

पंजाबमध्ये जन्म 

चार एप्रिल १९६५ रोजी जन्मलेल्या राधे माँ यांचे मूळ नाव सुखविंदर कौर. पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यातील डोरांगला गावामध्ये त्यांचा जन्म झाला. गावातील काही लोकांच्या म्हणण्यानुसार लहानपणापासूनच राधे माँ यांच्या वर्तनामध्ये वेगळेपणा होता. त्यांना दैवी शक्ती ज्ञात होत्या, असाही काहींचा समज (?) होता. 

'राधे माँ' नामकरण 

दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या राधे माँ यांचा वयाच्या सतराव्या वर्षी मोहन सिंग यांच्याशी विवाह झाला. घरातील आर्थिक बिकट परिस्थितीमध्ये पैसे कमावण्यासाठी त्या काही दिवस कपडे शिवण्याचे काम करीत होत्या. नोकरीच्या शोधात तिच्या नवऱ्याने कतार गाठल्यानंतर राधे माँ भक्तिमार्गाकडे वळल्या. वयाच्या तेविसाव्या वर्षी महंत रामदीनदास यांच्या त्या अनुयायी झाल्या. रामदीनदास यांना त्या राधेच्या आईप्रमाणे भासल्यामुळे ‌सुखविंदर कौरला 'राधे माँ' नाव देण्यात आल्याचे तिचे भक्तगण सांगतात 

सत्संगाचे प्रस्थ 

राधे माँ यांची लोकप्रियता उत्तरोत्तर वाढतच गेली. एम. एम. मिठाईवाला या मिठाईच्या साखळी दुकानांचा प्रमुख असलेल्या मनमोहन गुप्ता याने राधे माँ यांना गुरू केले. त्यानंतर गुप्ता कुटुंबीयांच्या निमित्ताने राधे माँने मुंबई गाठली. अर्थात, त्या मुंबईमध्ये निश्चित केव्हा आल्या आणि त्यांचा सत्संग मुंबईमध्ये केव्हापासून सुरू झाला, याबाबत अधिकृत माहिती नाहीच. 

दरबाराचाही गाजावाजा 

गुप्ता कुटुंबीयांपैकी संजीव गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये राधे माँ बारा वर्षांपासून राहत आहे. मुंबईमध्ये आल्यानंतर सत्संगाच्या निमित्ताने त्यांचे पंजाबमध्ये जाणे येणे वाढले होते. मात्र, मुंबईत भक्तगण जमविल्यानंतर त्यांचे पंजाब दौरे रद्द झाले आणि त्यांचे मुंबईतील प्रस्थ वाढत गेले. 'ममतामाई श्री राधे गुरू माँ चॅरिटेबल ट्रस्ट' या नावाने एक संस्थाही स्थापन करण्यात आली आणि राधे माँ यांचा दरबार भरविण्यास सुरुवात झाली. 

वादाची सुरुवात 

राधे माँ यांच्या विरोधात बोरीवली पोलिस ठाण्यात गुप्ता कुटुंबीयांपैकी निक्की गुप्ता या महिलेने हुंड्यासाठी छळ केल्याची तक्रार दाखल केली आहे. गुप्ता कुटुंबातल्या तरुणाशी निक्कीचे लग्न ठरले होते. राधे माँच्या परवानगीशिवाय हे लग्न पार पडणे अवघड होते. राधे माँनी या लग्नासाठी होकार दिला. मात्र, पीडितांच्या नातेवाइकांसमोर अनेक मागण्याही ठेवण्यात आल्या. लग्नानंतरही पैशांसाठी पीडितेचा छळ सुरू झाला. या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि पीडित महिलेच्या सासरच्या मंडळींसह राधे माँ यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी राधे माँ यांच्यासह निक्की गुप्ता यांच्या कुटुंबातील पाच जणांना समन्स बजावले आहे. 

सेलिब्रिटींची देवता 

राधे माँ यांचे मिनी स्कर्टमधील फोटो राहुल महाजन यांनी ट्विटरवर शेअर केल्यामुळे वेगळाच वाद निर्माण झाला होता. राधे माँ यांच्या एकूणच व्यक्तिमत्त्वाविषयी आरोप-प्रत्यारोपांचे द्वंद्व रंगले आहे. सुभाष घईसारख्या निर्माता-दिग्दर्शकाने राधे माँ यांची पाठराखण केल्यामुळे उच्चभ्रू वर्तुळातील त्यांचे स्थान स्पष्ट झाले आहे. राधे माँ यांना नाशिकच्या कुंभमेळ्यात येण्यासाठी द्वारकापीठाचे स्वरूपानंद सरस्वती आणि महंत ग्यानदास यांनी बंदी घातली आहे.

शर्मा यांचा दावा 
पंजाबमधील रहिवासी रणजित शर्मा यांनी 'तीस वर्षांपूर्वी आपण राधे माँ यांची सर्वांत जवळची व्यक्ती होतो,' असा गौप्यस्फोट केला आहे. राधे माँ आणि आपल्यामध्ये प्रेमसंबंध होते, असा दावाही शर्मा यांनी केला आहे. राधे माँ यांनी हा दावा फेटाळला आहे. मुंबई पोलिसांनी राधे माँ यांच्यासह सहा जणांविरुद्ध समन्स जारी केले आहे. तक्रारीमध्ये ज्यांची नावे आहेत त्यापैकी पाच जणांचा जबाब आधी नोंदवला जाईल; त्यानंतर राधे माँ यांचा जबाब नोंदवला जाईल, अशी माहिती बोरीवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी मुकुंद पवार यांनी दिली होती. गेल्या शुक्रवारी पोलिसांनी राधे माँ यांची चौकशी केली होती. मात्र, त्यांना अद्याप अटक झालेली नाही. 

भारतातून पळ काढणार? 

राधे माँविरोधात पोलिस कारवाई करणार असल्याचे वारंवार सांगितले जाते. औरंगाबाद, नांदेड दौऱ्यादरम्यान राधे माँच्या स्वीय सहायकाची चौकशी करण्यात आली होती. येत्या काही दिवसांत त्यांच्यावर होणाऱ्या संभाव्य कारवाईच्या भीतीने त्या भारतातून पळ काढणार असल्याचेही काही सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, त्याला कोणताही दुजोरा मिळालेला नाही. 'जिस का नाम होता है, वोही बदनाम होता है,' अशी वक्तव्ये करून राधे माँ यांनी आरोपांचा इन्कार केला आहे.