Translate

सोमवार, १९ जानेवारी, २०१५

राज्यसेवा परीक्षेला सामोरे जाण्यापूर्वी..

राज्यसेवा (एमपीएससी) स्पर्धापरीक्षेची पूर्वतयारी करताना काही अभ्यासतंत्रे विकसित करणे आवश्यक असते. त्याविषयी..
गेल्या काही वर्षांत राज्यभरातून स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. गेल्या वर्षीच्या राज्यसेवा परीक्षेचा विचार करता, सुमारे ४५० पदांसाठी, १२-१३ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यंदा, 
५ एप्रिल २०१५ रोजी होणाऱ्या राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेलाही १३-१४ लाख विद्यार्थी बसतील, अशी अपेक्षा आहे. या परीक्षेला सामोरे जाताना काही महत्त्वाच्या बाबी समजून घेणे आवश्यक आहे.
सर्वप्रथम परीक्षेसाठी नमूद केलेला अभ्यासक्रम समजून घ्या. अभ्यासक्रमातील प्रत्येक घटक-उपघटकांना प्रकरणांमध्ये विभाजित करून अभ्यासाला सुरुवात करावी. गेल्या दोन-तीन वर्षांत कोणत्या प्रकरणावर किती प्रश्न विचारले गेले आहेत, प्रश्नांचे स्वरूप कसे आहे हे समजून घेत अभ्यास करावा. प्रत्येक प्रश्न त्याला जोडून येणारे उपप्रश्न यांविषयी स्पर्धापरीक्षा देणाऱ्या मित्रांशी सविस्तर चर्चा करावी. 
वाचन तंत्र 
स्पर्धा परीक्षेची तयारी करताना अभ्यासाची स्वत:ची एक योजना बनवणे आवश्यक आहे. कोणते अभ्यास साहित्य वाचावे, कोणते टाळावे हे समजणे आवश्यक आहे. जास्त संदर्भग्रंथ वाचण्यापेक्षा प्रत्येक घटकावर एक-दोन संदर्भग्रंथांचे वाचन करावे. एखादा घटक वाचण्यापूर्वी त्या घटकावर मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये किती प्रश्न विचारले गेले आहेत, त्यांचे स्वरूप कसे होते, याचे विश्लेषण करावे म्हणजे आपल्याला कोणत्या भागावर किती लक्ष केंद्रित करायचे आहे हे लक्षात येईल. जर आपण एखादा घटक पहिल्यांदाच वाचत असाल तर वेळ लागतो, आपल्या पहिल्या वाचनातच तो विषय पूर्णपणे समजेल असे होत नाही. दुसऱ्यांदा वाचताना महत्त्वाच्या घटकांना अधोरेखित करावे, म्हणजे पुढच्या वेळी उजळणी करताना पूर्ण पुस्तक वाचण्याची आवश्यकता भासत नाही. पुढच्या वेळी फक्त अधोरेखित केलेल्या ओळींचे वाचन करावे, म्हणजे नेमक्या गोष्टींचा अभ्यास अधिक पक्का होता आणि वेळ 
मोडत नाही.
उजळणी
स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासात उजळणीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. माणसाचा मेंदू संगणक नाही. आपण जे वाचतो, ते तसेच्या तसे जास्त कालावधीपर्यंत लक्षात ठेवू शकत नाही. यासाठी आपण अभ्यासलेल्या विषयाची वेळोवेळी उजळणी करणे आवश्यक असते. अर्थात, उजळणी म्हणजे पाठांतर नाही.
अभ्यास करताना दर ४०-५० मिनिटांनंतर किमान पाच मिनिटांचा ब्रेक घ्यावा. त्यानंतर आपण काय वाचले ते आठवून पाहावे. प्रत्येक दिवसाअंती आपण काय वाचले हे झोपण्यापूर्वी आठवून पाहावे. वाचलेल्या घटकांवर आधारित सुमारे १०० प्रश्नांची निवड करून ते प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करावा. जे प्रश्न अडतील तो घटक पुन्हा वाचावा. महिन्याच्या शेवटचे दोन-तीन दिवस ठरवून केवळ त्या महिन्याभरात अभ्यासलेल्या प्रकरणांची उजळणी करावी.

वेळेचे व्यवस्थापन 
अभ्यास किती करावा, किती वेळ करावा याचे प्रत्येकाचे निकष वेगळे असतात. प्रत्येकाचा अभ्यासाचा असा स्वतंत्र 'प्राइम टाइम' असतो. त्या वेळीच त्याचा अभ्यास उत्तम होतो. पहाटेच्या शांत वातावरणात कुणाच्याही अभ्यासाची समाधी लागते तर कुणाची बठक रात्रीच्या नीरवतेत पक्की जमते. आपला अभ्यास उत्तम पद्धतीने कोणत्या वेळी होतो हे शोधून काढा. हा तुमचा 'प्राइम टाइम' नव्या घटकाची सुरुवात करण्यासाठी तसेच अवघड वाटणाऱ्या पॉइंट्सचा अभ्यास करण्यासाठी राखून ठेवावा. बाकीच्या वेळेत उजळणी, पाठांतर इत्यादी गोष्टी कराव्यात. 
लिहिणं, वाचणं, नोट्स काढणं, प्रश्न सोडवणं, विश्लेषण या परिघाबाहेरही स्पर्धा परीक्षेची दुनिया विस्तारलेली आहे. एकाग्रता कमी झाली की, अभ्यासाला सरळ अर्धविराम देऊन या तयारीकडे वळता येईल. झोपेचे तास कमी करून केलेल्या अभ्यासापेक्षा व्यवस्थित झोप व पुरेसे खाणे झाल्यावर केलेला काही तासांचा अभ्यास अधिक चांगला होतो. ज्या वेळी आपल्याला झोप येत असेल, अभ्यासाचा मूड नसेल त्या वेळी तो वेळ 'सीसॅट पेपर २' साठी किंवा समूह चर्चेसाठी राखून ठेवलेला चांगला. शक्य आहे तेव्हा अभ्यासाचे वेळापत्रक करण्यापेक्षा पूर्ण दिवसभराचे वेळापत्रक ठरवायला हवे. वेळापत्रकानुसार अभ्यास जमत नसेल (बहुतेक वेळा तो जमत नाहीच!) तर अभ्यासानुसार वेळापत्रक बनवा. 
संदर्भग्रंथांचे वाचन 
* चालू घडामोडी - या उपघटकाच्या तयारीसाठी दररोज दोन दैनिकांचे सविस्तर वाचन करून त्यांतील महत्त्वाचे मुद्दे नमूद करून ठेवावेत. 
* इतिहास - इतिहासाचा अभ्यास करताना सर्वप्रथम क्रमिक पुस्तकांचे वाचन करावे.
प्राचीन व मध्ययुगीन भारताच्या इतिहासासाठी क्रमिक पुस्तकांचा आधार घ्यावा. 
आधुनिक भारताचा इतिहास- बिपिनचंद्रा. हे पुस्तक मराठीत भाषांतरित झालेले आहे. 
आधुनिक भारताचा इतिहास - ग्रोवर अ‍ॅण्ड ग्रोवर. हे पुस्तक मराठीत भाषांतरित झालेले आहे. 
* भूगोल- सर्वप्रथम पाचवी ते बारावीपर्यंतच्या क्रमिक पुस्तकांचे वाचन करावे. तसेच भारताचा भूगोल- प्रा. ए. बी. सवदी, महाराष्ट्राचा समग्र भूगोल- प्रा. ए. बी. सवदी ही पुस्तके अभ्यासावीत. 
* पर्यावरण व परिस्थितीकी या घटकांचा अभ्यास करण्यासाठी इंटरनेटचा वापर केल्यास अधिक फायदा होतो.
आपले पर्यावरण- नॅशनल बुक ट्रस्ट. 
* भारतीय राज्यघटना- या घटकासाठी अकरावी-बारावीची क्रमिक पुस्तके वाचावीत. तसेच भारतीय राज्यघटना- एम. लक्ष्मीकांत (इंग्रजीत) आणि आपली संसद- डॉ. सुभाष कश्यप. 
(हे पुस्तक मराठीत भाषांतरित 
झालेले आहे.) या पुस्तकांचा अभ्यास करावा.
* आíथक व सामाजिक विकास- इयत्ता अकरावी, बारावीची क्रमिक पुस्तके अभ्यासावीत.
* भारतीय अर्थव्यवस्था- 'प्रतियोगिता दर्पण' (हे िहदीत तसेच इंग्रजीत उपलब्ध आहे. या पुस्तकाच्या अखेरीस नमूद केलेले प्रश्न अवश्य वाचावेत.) आणि महाराष्ट्राची आíथक पाहणी अभ्यासावी. 
* विज्ञान आणि तंत्रज्ञान - सहावी ते दहावीपर्यंतची क्रमिक पुस्तके वाचून त्यानंतर 'स्पेक्ट्रम पब्लिकेशन'च्या (इंग्रजी) पुस्तकाचे वाचन करावे. 
वरील पुस्तकांव्यतिरिक्त योजना, कुरुक्षेत्र, लोकराज्य या मासिकांतील अभ्यासक्रमासंदर्भातील लेख अवश्य वाचावेत. 
grpatil2020@gmail.com

अभिनेत्री बेबी शकुंतला यांचे निधन

बालतारका ते अभिनेत्री असा प्रवास करणारी पहिली अभिनेत्री बेबी शकुंतला ऊर्फ उमादेवी खंडेराव नाडगौडा यांचे रविवारी सकाळी येथे निधन झाले. त्या ८३ वर्षांच्या होत्या. तपभराच्या कालावधीत त्यांनी िहदी मराठी चित्रपटसृष्टीत साठ चित्रपटांमध्ये अभिनय केला. विवाहानंतर त्यांनी अभिनय संन्यास घेतला, तरी चित्रपटसृष्टीशी त्यांचे नाते मात्र अखेपर्यंत कायम होते. येथील पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी आहे. 
बेबी शकुंतला या जुन्या मराठी, िहदी चित्रपटसृष्टीतील प्रथितयश अभिनेत्री होत्या. १७ नोव्हेंबर १९३२ रोजी पुणे येथे त्यांचा जन्म झाला. महाजन कुटुंबातील त्या एकमेव कन्या होत्या. त्यांचे शिक्षण पुण्याच्या भावे
प्रशालेत झाले. त्यांचे वडील मुद्रणालयात नोकरीस होते. प्रभात स्टुडिओचे मालक दामले हे त्यांच्या आईचे नातेवाईक होते व त्यांनीच त्यांना चित्रपटात अभिनय करण्यासाठी विचारले. त्यांच्या वडिलांना ते मान्य नव्हते पण अखेर बरेच समजून सांगितल्यानंतर त्यांचा चित्रपट प्रवेश नक्की झाला. 
प्रभातच्या '१० वाजता' या चित्रपटातून पहिल्या मराठी बालतारका म्हणून त्यांचे चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले. १९४४ साली प्रदर्शित झालेल्या 'रामशास्त्री' चित्रपटातील त्यांच्यावर चित्रित झालेली गाणी खूपच गाजली. 
'दोन घडीचा डाव त्याला जीवन ऐसे नाव' या गाण्याने त्यांची सर्वदूर ओळख झाली. बालतारका ते अभिनेत्री असा प्रवास करणाऱ्या त्या पहिल्या अभिनेत्री ठरल्या. तत्पूर्वी ज्या बालतारका म्हणून चमकल्या, त्यापकी कोणालाही पुढे अभिनेत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली नव्हती. 
बारा वर्षांच्या कालावधीत त्यांनी मराठी व िहदी भाषेतील साठ चित्रपटांमध्ये अभिनय केला. मायाबाजार, शारदा, तारामती, भाग्यवान, अखेर जमलं, छत्रपती शिवाजी, नन्हे-मुन्हे, अबोली, सौभाग्य, मायबहिणी, कमल के फुल, फरेब, सपना, लहरे, परदेस, झमेला आदी गाजलेल्या चित्रपटांचा त्यामध्ये समावेश होतो. 
मास्टर अविनाश, दुर्गा खोटे, केशवराव दाते आदींसोबत त्यांनी काम केले. भाजली पेंढारकर, बिमल रॉय, दिनकर द. पाटील, अनंत माने, केदार शर्मा, बी.आर.चोप्रा यांसारख्या नामवंत दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केले होते. पूजा, शिवकन्या, बिंदिया, ब्रजबहू हे चित्रपट त्यांनी केले. त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले होते. त्यामध्ये प्रभात पुरस्कार, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार, कोल्हापूर भूषण शाहू मोडक पुरस्कार, राजा परांजपे पुरस्कार आदींचा समावेश आहे. १९५४ मध्ये त्यांनी येथील उमा चित्रपटगृहाचे चालक खंडेराव नाडगौडा यांच्याशी विवाह केला. तेव्हापासून त्यांनी चित्रपट संन्यास घेतला होता. 
चित्रपटसृष्टीवर शोककळा
बेबी शकुंतला यांच्या निधनाचे वृत्त कळताच येथील हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली. निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञान यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 
ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांनी त्यांच्या आठवणी जाग्या केल्या. ते म्हणाले, की त्यांच्यासोबत एकत्र काम करण्याचा योग आला नाही. पण त्यांचा सहज सुंदर अभिनय पाहून बरेच काही शिकता आले. 'अबोली' चित्रपटात मूकबधिर कलाकाराचे काम करताना त्यांनी दाखवलेला हृदयस्पर्शी अभिनय अमीट छाप उमटवणारा आहे. शारदा नाटकावर आधारित 'शारदा' चित्रपट बनवला गेला. 
नाटकातील शारदेपेक्षा त्यांचा अभिनय काकणभर सरस होता. त्यांनी चित्रपटात काम करायचे सोडले असले, तरी मराठी चित्रपटसृष्टी व चित्रपट महामंडळाशी त्यांचे नाते अखेपर्यंत कायम होते. प्रभातच्या तुतारीचे पुनरुज्जीवन करण्याच्या कार्यक्रमास त्या आवर्जून उपस्थित होत्या. त्यांच्या जाण्याने चित्रपट महामंडळाचा आधार आम्ही गमावून बसलो आहोत. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय कोंडके यांनी जुन्या काळातील नसíगक अभिनय करणारी अभिनेत्री गमावल्याचे सांगितले. 
दादा कोंडके यांच्यापासून त्यांच्या कुटुंबीयांशी संबंध होता. 'उमा' चित्रपटगृह त्यांचेच असल्याने मराठी चित्रपटाच्या वितरणाला त्यांच्याकडून सतत मोठी मदत मिळत होती.