Translate

बुधवार, २४ डिसेंबर, २०१४

अटलबिहारी वाजपेयी आणि मदनमोहन मालवीय यांना 'भारतरत्न'

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि हिंदू महासभेचे प्रणेते पंडीत मदन मोहन मालवीय यांना बुधवारी देशातील सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न' जाहीर झाला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या ट्विटर हॅंडलवरून यासंबंधी माहिती दिली. मालवीय यांना मरणोत्तर हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. वाजपेयी यांचा गुरुवारी, २५ डिसेंबर रोजी वाढदिवस असल्यामुळे 'भारतरत्न' जाहीर करून केंद्र सरकारने त्यांना जन्मदिनी सर्वोच्च मोलाची भेट दिली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून वाजपेयी यांना 'भारतरत्न' देण्याविषयीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. केंद्रात सत्तापालट होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील भाजपचे सरकार सत्तेवर आल्यापासूनच वाजपेयी यांना यंदा 'भारतरत्न' जाहीर होणार, या स्वरुपाची चर्चा सुरू झाली होती. २५ डिसेंबर १९२४ रोजी जन्मलेल्या वाजपेयी यांनी १९९८ ते २००४ या काळात देशाचे पंतप्रधानपद भूषविले आहे. जनसंघाचे संस्थापक सदस्य असलेले वाजपेयी यांनी केंद्रामध्ये विविध प्रकारची पदे सांभाळली आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदासोबतच परराष्ट्रमंत्रीपदही त्यांनी सांभाळले आहे. सक्रिय राजकारणातून निवृत्त घेतलेल्या वाजपेयी यांनी आपल्या वक्तृत्त्व कौशल्याने अनेकांची मनं जिंकली आहेत. त्यांनी लिहिलेल्या अनेक हिंदी कविता लोकप्रिय ठरल्या आहेत.
पंडित मदन मोहन मालवीय भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी नेते होते. जगातील सर्वांत मोठ्या विद्यापीठांपैकी एक असलेल्या बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे संस्थापक सदस्य म्हणूनही मालवीय परिचित आहेत. राजकीय क्षेत्रासोबत शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे कार्य आजही कौतुकास्पद ठरते. स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्षपद त्यांनी दोन वेळा भूषविले होते. मालवीय यांचा जन्मदिवस २५ डिसेंबर १८६१ असून, १२ नोव्हेंबर १९४६ रोजी त्यांचे निधन झाले.

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आणि पंडित मदनमोहन मालवीय यांचा अल्पपरिचय!

अटल बिहार वाजपेयी आणि पंडीत मदन मोहन मालवीय यांना भारतरत्नने सन्मानित करण्याची माहिती खुद्द राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी याबाबतची माहिती दिली. अटल बिहारी वाजपेयी हे भारतीय जनसंघाच्या संस्थापकांपैकी ते एक सदस्य आहेत. तर पंडीत मदनमोहन मालवीय यांनी हिंदू बनारस विद्यापीठाची स्थापना केली आहे. या दोन्ही व्यक्तींचा अल्पपरिचय खालीलप्रमाणे-


अटलबिहारी वाजपेयी यांचा अल्पपरिचय-
  • 25 डिसेंबर 1924 रोजी ग्वाल्हेरमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म झाला.
  • श्यामाप्रसाद मुखर्जी आणि दीनदयाल उपाध्याय यांचे ते शिष्य आहेत.
  • भारतीय जनसंघाच्या संस्थापक सदस्यापैकी ते एक आहेत.
  • 1968 ते 1973 या काळात अटल बिहारी वाजपेयींनी जनसंघाचे अध्यक्षपद भूषवले आहे.
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या पांचजन्यसह विविध माध्यमात त्यांनी पत्रकारिताही केली आहे.
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते पूर्णवेळ प्रचारक होते तसंच ते आजन्म अविवाहित राहिले आहेत.
  • पहिल्या बिगर काँग्रेसी सरकारमध्ये परराष्ट्रमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
  • अटलबिहारी हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या काळात दोन वेळा पंतप्रधानही राहिले आहेत.
  • अणू चाचणी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करण्याचे काम त्यांनी केले.
  • सुवर्ण चतुष्कोन या रस्ते विकास प्रकल्पाचे ते प्रणेते आहेत.
  • दिल्ली-लाहोर बस यात्रा सुरू करून भारत-पाक संबंध सुधारण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
  • कारगिल युद्धामध्ये पाकिस्तानला वाजपेयींच्या काळातच धूळ चारली होती.
  • उत्कृष्ट वक्ता आणि कवी मनाचा नेता अशी त्यांची ओळख राहिली आहे.
पंडित मदनमोहन मालवीय यांचा अल्पपरिचय-

  • 25 सप्टेंबर 1861 रोजी अलाहाबादमध्ये त्यांचा जन्म झाला
  • संस्कृत हिंदी भाषेत त्यांनी विपूल लेखन केले आहे. तसंच त्यांना पंडित हि उपाधी दिली गेली आहे.
  • कोलकाता विद्यापीठातून पदवी प्रात्प केली
  • मालवीय यांनी बनारस विद्यापीठाची स्थापना केली
  • मालावीय हे चार वेळा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते अध्यक्ष राहिले आहेत.
  • हिंदू महासभेची स्थापना त्यांनी केली आहे.
  • 1942 च्या भारत छोडो आंदोलनात त्यांचा सक्रीय सहभाग होता.
  • भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधीच 12 नोव्हेंबर 1946 मध्ये त्यांचे निधन झाले.